रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद व राज्यस्तरीय मेळावा रत्नागिरी येथील चंपक मैदानावर दि. १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री उदय सामंत हे आहेत.
या भव्य राज्यव्यापी अधिवेशन आणि मेळाव्याच्या आयोजनाचा मान यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे. आयोजक म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांनी याबाबत बोलताना सांगितले की, राज्य शिक्षक संघटनेचे शिक्षक नेते संभाजी थोरात, संघटनेचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात जुन्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मांडून तो सोडविला जाणार आहे. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय पारित करुन घेण्याची प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी नियमिततेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे, वैद्यकीय बिलासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्रप्रमुख व तत्सम संवर्गाची पदे शंभर टक्के शिक्षकांमधून भरणे, उच्चशिक्षित शिक्षकांना अधिकारीपदी पदोन्नती देणे, महिला शिक्षकांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करणे इत्यादी महत्त्वाचे प्रश्नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी या शिक्षण परिषदेत पाठपुरावा केला जाणार आहे. या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील शिक्षक सहभागी होणार आहेत असे संतोष कदम यांनी शेवटी सांगितले.
या मेळाव्याचे यशस्वी नियोजन आणि आयोजन राज्य प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी जिल्हाच्यावतीने करण्यात आले असून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, राज्याचे संपर्क प्रमुख विकास नलावडे, जिल्हाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस संदीप जालगावकर यांनी केले आहे. मेळावा यशस्वीतेसाठी चंद्रकांत कोकरे, हिदायक भाटकर, सुनील रामाने, अजय गराटे, शांताराम पवार, मनोजकुमार खानविलकर, मंगेश शिंदे, जीवन सुर्वे, संजय तांदळे, राजेंद्र महाडिक, रामचंद्र निकम, मंगेश मोरे, दीपक साबळे, संदीप परटवलकर, महिला आघाडी प्रमुख दर्शना कवठणकर, शिक्षण सेवा प्रमुख अंगद अबूज, राज्य कार्यकारी सदस्य अरुण जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख विधायक भाटकर आदींसह नियोजन समिती सदस्य मेहनत घेत आहेत.
