जुनी पेन्शन ही मागणी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन सकारात्मक पध्दतीने सोडवू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : जुनी पेन्शन या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून त्याचा योग्य निर्णय सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा भव्‍य शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रंसगी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे महसूल , पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम, शिक्षक महासंघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष अंबादास वाजे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे म्हणाले, जुनी पेन्शन या मागणीसाठी अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, संबधित विभागाच्या मंत्री आणि शिक्षक संघाचे प्रतिनिधी घेऊन राज्यस्तरीय समिती गठीत करुन चर्चेतून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणे शासनाची जबाबदारी आहे, त्या निश्चित पूर्ण केल्या जातील. शिक्षकांवर बंधने नकोत. जिथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो, या शब्दात शिक्षकांचे कौतुक करुन आई-वडिलांनंतर शिक्षकांचेच आदरस्थान आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर शिक्षण खात्याचा दिलेला भार ते उत्तमरित्या सांभाळत आहेत. आज शिक्षकांना फक्त ज्ञानार्जनाचे काम देणे आवश्यक आहे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी आवर्जून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही शिक्षकांच्या मागण्यांसाठी संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी भारत तरुणाईचा देश आहे आणि या तरुणाईला घडविण्याचे काम शिक्षक करीत आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात बदल आहे. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झाले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही, शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख करीत शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ग्रोथ इंजिनच आहे. त्यामुळे शिक्षक सर्वश्रेष्ठच आहे, असे सांगून या शासनाने, सरकारने घेतलेले सर्व निर्णय सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून घेतले, असेही ते शेवटी म्हणाले.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षणाचा पाया अतिशय समर्पित भावनेने शिक्षक करीत आहेत. खूप चांगले शिक्षण देऊन चांगल्या पदांवर आज मुले काम करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न एकत्र बसून सोडवू असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या अधिवेशनात जाहीर करण्यास सांगितले आहे. संभाजीराव ऊर्फ तात्यासाहेब नि:स्वार्थीपणे कामं करणारे अध्यक्ष आहेत. मी त्यांचे कौतुक करतो.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे संवेदनशील मुख्यमंत्री असून ते अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत .पेन्शनची मागणी सर्वत्र कार्यक्रमात होत आहे. संभाजी थोरात यांनी शिक्षकांनाही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास प्रोत्साहित करावे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिक्षणविषयक क्रांतिकारी निर्णय घेतले आहे. माध्यमिक शिक्षकांसह प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. शिक्षक सुद्धा शिक्षण खात्यात मोठे अधिकारी व्हावेत, अशीही आमची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. केंद्र प्रमुखांच्या जागा १०० टक्के भरल्या जातील तसेच ३० हजार शिक्षकांची भरती पुढील दोन महिन्यात शासन करणार आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. सुरुवातीला स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास वाजे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरुडकर आणि स्वाती शिंदे- पवार यांनी केले.

जाहिरात..
Exit mobile version