जिल्हा प्रशासन इयत्ता दहावी/बारावी परीक्षेसाठी सज्ज

गैरमार्गमुक्त / कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हयात 16 भरारी पथके.


रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय भरारी पथके तयार केली आहेत. या परीक्षांच्या भयमुक्त व कॉपीमुक्त आयोजनाबाबत राज्य मंडळाने शिक्षासूची जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हयामध्ये भयमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.रत्नागिरी किर्तीकिरण पुजार, शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे या वर्षांच्या परीक्षार्थीना निकोप वातावरणामध्ये परीक्षा देण्यास मदत होणार आहे. तसेच कॉपी बहाद्दरांवर भरारी पथकांची करडी नजर असणार आहे.
फेब्रुवारी / मार्च महिन्यामध्ये होणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची जिल्हा प्रशासनाने पुर्ण तयारी केली आहे. या परिक्षेमध्ये व्यक्तिगत व सामुहिक गैरमार्गाच्या प्रकरणांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र भरारी पथक निर्माण करण्यात आली आहेत. या भरारी पथकांना परीक्षा कालावधीमध्ये जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेट देऊन परीक्षा संचलनाची पहाणी करण्याचा व गैरमार्गांना आळा घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या वर्षी परीक्षा आयोजनामध्ये राज्यमंडळाने कडक शिक्षासूची जाहीर केली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित केली असून, जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी एकूण केंद्र ३८ तसेच परिरक्षक कार्यालय १२ असून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३७९ आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीच्या लेखी परीक्षा ०२ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित केली असून, इयत्ता दहावी परीक्षेसाठी एकूण केंद्र ७३ तसेच परिरक्षक मंडळ १३ असून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार १९९ इतकी आहे. या परीक्षांसंदर्भात कोकण विभागीय मंडळ यांच्या स्तरावर केंद्रसंचालक, मुख्याध्यापक व परिरक्षक यांच्या सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. रत्नागिरी यांनी कळविले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version