रत्नागिरी : गणेशगुळे ग्रामपंचायतीकडून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत ७६ लाख रुपयांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच संदीप शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. आगरगुळे, लाडवाडी, रांगणकरवाडी, तोडणकरवाडीतील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे.
या वेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुलकर्णी, ओंकार फडके प्रमुख उपस्थित होते. नळपाणी योजनेच्या विहिरीसाठी विनामोबदला जागा देणारे सतीश दत्तात्रय पटवर्धन आणि साठवण टाकीसाठी विनामोबदला जागा देणारे शशिकांत बाबू शिंदे या ग्रामस्थांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला गती मिळाली असून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवड झाली होती. त्या वेळी भारतीय जनता पार्टीने गावातल्या ग्रामस्थांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. सरपंच संदीप शिंदे यांनी ही योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या पाणी योजनेचे भूमिपूजन उत्साहात करण्यात आले. सरपंच संदीप शिंदे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपायला दहा दिवस उरलेले असताना त्यांनी पाच वर्षात विकास कामांसाठी घेतलेल्या मेहनतीचे ग्रामस्थांनी कौतुक करत असे सरपंच आजपर्यंत पाहिले नसल्याची भावना व्यक्त केली. सरपंच संदीप शिदे यांनी आपल्या भाषणात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले. भाजपाच्या अंत्योदयाच्या विचारांमुळेच मी हे काम करू शकलो व हा कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडू शकलो व विविध विकास कामांना न्याय देऊ शकलो, असे सांगितले. लोकांना पाणी देणे हे मी माझे भाग्य समजतो. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, ग्रामस्थ, उपसरपंच रवींद्र जोशी, ग्रामपंचायत सदस्य, विजय शिंदे, प्रसाद तोडणकर, मोहन तेरवणकर, गावकर गुळेकर, विजय लाड, विक्रांत रांगणकर, माधव पटवर्धन, गौरव फडके, प्रज्योत गुळेकर, सुधाकर लाड, राम पटवर्धन, सुनील फडके आदींसह सर्व वाड्यांमधील प्रमुख व्यक्ती, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सरपंच शिंदे यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले, जरी पुढील निवडणुकीत महिला आरक्षण पडले असले तरी संदीप शिंदे हे गावाच्या विकासासाठी कार्यरत राहतील. त्यांना भाजपाकडून जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची संधी मिळेल. त्यांचे कार्यक्षेत्र फक्त गाव नाही तर जि. प. गट राहील. एखादी योजना आणायची असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्या त्या सरकारी कार्यालयात जावे लागते. शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा केला आहे. दोन वर्षे आमचे सरकार नव्हते. परंतु आता केंद्रात व राज्यात आणि गावातही भाजपाचेच सरकार असल्याने डबल नव्हे तर ट्रिपल इंजिनद्वारे गावचा विकास सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार संपूर्ण जिल्हा परिषद गटात पसरवून नेतृत्व करावे, असे आवाहन केले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*