समाज…
होय. माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक. एका शब्दावरून विषयाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करतो, ती म्हणजे निवडलेल्या विचारांची व्याप्ती ही खूपच जास्त आहे आणि विषय तितकाच वैचारिक देखील आहे. परंतु शब्द मर्यादांचं बंधन असल्यामुळे फार वेळ न घालवता, आणि सध्या बनवलेल्या समाजाला कोणत्याही राज्याच्या, देशाच्या , सीमेच्या, धर्माचा किंवा पक्षाच्या देखील चौकटीत न अडकवता या पृथ्वीतलावरील माणसांच्या नातेसंबंधातून आचार विचारातून जो नैसर्गिक रित्या समूह तयार झाला , त्या नैसर्गिक समाजाबद्दल बोलणं मला फार जास्त महत्त्वाचं आणि मुद्द्याचं वाटतं. त्यामुळे चौकटीच्या समाजाबद्दल न बोलता एकूणच मुख्य समाज या संकल्पनेला मध्यस्थी ठेवून हा लेख लिहीत आहे.
विषयाचा विचार करत असताना सगळ्यात आधी मला प्रश्न पडतो तो म्हणजे हा समाज कसा बनला? तर असं लक्षात आलं की काही माणसे एकत्रित येऊन त्यांचं कुटुंब तयार झालं. एका कुटुंबाचं दुसऱ्या कुटुंबाशी नातं जोडलं गेलं. अशी अनेक कुटुंब एकत्र आली आणि माणसांशी माणसं जोडली गेल्यामुळे समाज ही संकल्पना तयार झाली. मुळात माणसं जोडली गेली ,कुटुंब जोडली गेली, नातेसंबंध तयार झाले , विचारांची देवाण-घेवाण झाली, पण नक्की कशी? तर त्याचा पाया सापडतो तो म्हणजे लग्न संस्कृतीमध्ये. लग्न या एका गोष्टीमुळे माणसं एकत्र आली ,कुटुंब तयार झालं ,कुटुंबांशी कुटुंब जोडली गेली आणि लग्न गाठी सोबतच समाजाची गाठ सुद्धा घट्ट बांधली गेली. मात्र हेच लग्न हेच समाजासमोरील सध्याचं सर्वात मोठं आव्हान बनून उभ आहे. ज्या लग्न संबंधामुळे हा समाज उभा आहे, जनावरांपेक्षा आपल्याला एक वेगळंच स्थान देतो, तेच लग्न जगभरातील प्रत्येक समाजातून धोक्यात असलेला दिसून येतं. जगभरात असंख्य घटस्फोटाच्या केस प्रत्येक मिनिटाला तयार होत आहेत. त्यामुळे एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाशी तोडले जात आहे. आणि परिणामी समाज विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे..

मित्रहो आज समाजात बलात्कारांच्या केसेसचा आकडा हा झपाट्याने वाढताना दिसतो. तो गणला देखील जातोय. पण समाजातील माणसांच्या मेंदूचा आणि विचारांचा बलात्कार क्षणोक्षणी होतोय या भयंकर आव्हानाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतं.. कारण आज समाज म्हणजे माणसांचा समूह यापेक्षा समाज म्हणजे विशिष्ट जाती-धर्माचा रंगांचा झेंड्यांचा आणि मतांचा समूह म्हणून ज्या वेळेस समाजाकडे पाहिलं जातं, आणि काही वैचारिक बलात्कारी लोकांकडून याच समाज नावाच्या विशिष्ट समूहाला आपण वाहवू त्या दिशेने वहावल जातं, त्यावेळेस समाजातील त्या सामान्य माणसांचं काय हा प्रश्न नक्कीच पडतो.
आणि त्यावेळेस आव्हान उभे राहत ते म्हणजे समाजाला योग्य दिशा देण्याचं आणि त्या दिशेने नेण्याचं. कारण समाज शिक्षित नक्कीच झालाय,पण मानसिक विकास अजूनही गंजलेला दिसून येतो. त्यामुळे आज समाजाला शारीरिक बलात्कारापेक्षा , जास्त महत्त्वाचं म्हणजे मानसिक बलात्कारापासून वाचवणं हे समाजासमोरील सध्याचं सर्वात मोठा आव्हान आहे.
माणूस म्हटलं की स्पर्धा आली, आणि आज या समाजात टिकायचं असेल तर स्पर्धे शिवाय किंवा स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. अगदी वैज्ञानिक थेरी मध्ये सुद्धा हेच सांगितलं जातं की, जगण्यासाठी स्पर्धा करावी लागते.. मात्र ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी..
मात्र हीच स्पर्धा सुद्धा आज समाजासमोरील एक मोठा आव्हान बनलेल दिसत. कारण आज होणाऱ्या स्पर्धा ह्या समाजात स्वतःला सिद्ध करण्यासाठी नव्हे , तर दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी आणि दुसऱ्याचे पाय खेचण्यासाठी जास्त प्रमाणात केलेली दिसून येते. त्यामुळे आपोआपच समाजातली शांती भंगायला सुरुवात झालेली आहे. समाजामध्ये काहीतरी करण्याचा श्वास आणि ध्यास दोन्ही आहे, पण आपापसातच केलेल्या सामाजिक राजकारणामुळे , आज समाजामध्ये श्वास उरला आहे मात्र ध्यास संपत चालला आहे.

ज्यावेळेस समाजाबद्दलच्या याच विचारांना मी थोडा अपडेट करतो आणि परिस्थितीनुसार अपग्रेड करतो त्यावेळेस दिसून येतं की, आज समाज हा, ऑफलाईन उरला नाहीये तर, व्हाट्सअप इन्स्टा आणि फेसबुकच्या ऑनलाईन ग्रुप मध्ये दिसून येतो. त्यावेळेस खऱ्याखुऱ्या ऑफलाइन समाजासमोर ऑनलाइन समाज हे सुद्धा एक आव्हान म्हणूनच उभारलेल दिसतं. कारण ऑनलाईन समाजात असंख्य अफवा, वाद, fraud आणि स्कॅम पसरवले जात आहेत, आणि याच्याच परिणामार्थ याच ऑनलाईन समाजातील लोकांना खऱ्याखुऱ्या समाजाची, त्यातील माणसांची देखील भीती वाटायला सुरुवात झालेली आहे. ऑनलाइन वाद हे ऑफलाईन समाजामध्ये विष मिसळल्याचे साधन आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे फेसबुक वर मित्र हजार आणि पोहोचवायला मिळत नाहीत चार, या संकल्पनेप्रमाणे ऑनलाइन गोष्टींमुळे दूर चाललेला समाज हा ऑफलाइन समाजाच्या दृष्टिक्षेपास आणून देणं हे खरं सध्याच्या समाजासमोरील सर्वात मोठा आव्हान आहे.
काही महिन्यांपूर्वी एक एकांकिका पाहिली, ‘जंगल बटा चला है’ नावाची. त्यामध्ये असं दाखवण्यात आलं की, कोल्हा जातीच्या प्राण्यांमध्ये काही गैरसमजातून वाद निर्माण झाले आणि त्यांच्यामध्ये दोन गट तयार झाले त्यांचे वाद इतके शिगेला पोहोचले, ही एका गटातील कोल्ह्यांनी दुसऱ्या गटातील कोल्ह्यांना संपवायला सुरुवात केली, हीच परिस्थिती कुठेतरी मला आज समाजातील सद्यस्थिती दाखवून देते.
आज समाजामध्ये निरार्थक गैरसमजातील वादामुळे माणसांना माणसालाच संपवायला सुरुवात केलेली दिसते, त्यामुळे माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही शिकवण समाजात शिकवणे आणि रुजवणे हे समाजासमोरच सगळ्यात मोठे आव्हान आज आपल्या सर्वांसमोर आहे असं मला नक्कीच वाटतं. म्हणूनच या सर्व आव्हानांना एकत्रितपणे पेलणे आणि ती आव्हान सोडवणं ही समाजाचीच मुख्य जबाबदारी आहे, ती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढच्या कर्तव्यासाठी आपली पावले पडली पाहिजेत. (✍️ हर्ष सुरेंद्र
नागवेकर
: रत्नागिरी)
