ग्रहण : यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावर्षी दि २४ व २५ ऑक्टोबर २०२२ अशा दोन अमावस्या आहेत. लक्ष्मीपूजन सोमवार २४ ऑक्टोबरला असून ग्रहण मंगळवार २५ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी ग्रहणाची कोणतीही अडचण नाही. लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसरे दिवशी ग्रहण व ग्रहणाचे दुसरे दिवशी बलिप्रतिपदा आहे. त्यामुळे दिवाळीत जरी ग्रहण आले असले तरी धार्मिक विधीसाठी, पूजेसाठी कोणतीही अडचण नाही.
ग्रहण-माहिती: यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या २५ ऑक्टोबर २०२२, मंगळवारी, खंडग्रास सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात ग्रस्तास्त (ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाणे) दिसणार आहे. त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहणमोक्ष दिसणार नाही. म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तावर पुण्यकाल मानावा.
ग्रहणस्पर्श: दुपारी १६:४९.
ग्रहणमध्य: दुपारी १७:४३.
ग्रहणमोक्ष (सूर्यास्त): संध्याकाळी १८:०८.
ग्रहणपर्वकाळ: १ तास १९ मिनिटे.
ग्रहणवेध: ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटे ३:३० पासून लागणार असून सूर्यास्तावर ग्रहणाचा वेध पाळावा. अबालवृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तावर वेध पाळावेत. वेधामधे भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण-पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण ४:४९ ते सायंकाळी ६:०८ वर पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत.
ग्रहणकर्म: ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे, पर्वकाळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. अशौच, सुतक असताना ग्रहणकाळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.
ग्रहणफळ: (१) ऋषभ, सिंह, धनु, मकर या राशींना शुभफल. (२) मेष, मिथुन, कन्या, कुंभ या राशींना मित्रफल. (३) कर्क, तुला, वृश्चिक व मीन या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
मंत्रतंत्रपुरश्चरण: नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाळ आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण-पर्वकाळात केल्याने मंत्रसिद्धी होतो.

ग्रहणस्नान: ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे तरीही उष्णोदकाहून शितोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानकाळी नर्मदेचे स्मरण करावे.
ग्रहणमोक्षस्नान आणि भोजन: या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसल्याने मोक्षवेळा दिलेल्या नाहीत. तथापि भारतीय प्रमाणवेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्षवेळेनंतर म्हणजे सायंकाळी ६:३२ नंतर मोक्षस्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे.
गर्भवतींसाठी नियम:
१) या काळात कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे.
२) पायाची अढी घालून बसू नये.
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे.
४) झोप घेऊ नये.
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे.
ग्रहण-शास्त्रार्थ: चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोवर डोळ्यांनी दिसत असेल तोवर पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावला, तर त्यानंतर दुसर्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल; पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून, अस्तानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणचेही बिंब जर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल, तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले, तर शास्त्ररित्या स्पर्शकाळ व मोक्षकाळ ही समजून घेऊन, स्नानदानादिक कर्मे करावीत. ग्रहणस्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत.
चूडामणिग्रहण: रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणिग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते.

स्नानासाठी पाणी कोणते उत्तम:
(१) कढत पाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक.
(२) दुसर्याने दिलेल्या पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक.
(३) पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक.
(४) त्यापेक्षा वाहाते पाणी पुण्यकारक.
(५) वाहात्या पाण्यापेक्षा सरोवराचे पाणी पुण्यकर.
(६) सरोवराच्या पाण्यापेक्षा नदीचे पुण्यकर.
(७) याप्रमाणेच तीर्थे, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकर.
स्नान-दान-उपवास नियम:
(०१) ग्रहणांत (खरेतर नेहेमीच) वस्त्रासह स्नान करावे. अशा स्नानाला ग्रंथकरांनी मुक्तिस्नान म्हटले आहे. ते मुक्तिस्नान जर केले नाही, तर सुतकीपणा जात नाही.
(०२) ग्रहणाच्या स्नानाला मंत्राची जरूरी नसते.
(०३) सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. काही बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात.
(०४) सोयर अथवा सुतक यामध्ये ग्रहणाबद्दल-स्नान, दान, श्राद्ध वगैरे अवश्य करावीत.
(०५) नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला, आणि बायको जर विटाळशी असली. तर भांड्यात पाणी घेऊन, त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. तीन दिवस किंवा एक दिवस उपास करून ग्रहणाची स्नानदानादि कर्मे केली असता मोठे फळ मिळते. एकच दिवस जर उपास करणे असेल, तर तो ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपास अहोरात्र करावा असेही म्हणतात.
(०६) मुले असलेल्यांनी व गृहस्थाश्रमींनी ग्रहण, संक्रांति दिवशी उपास करू नये. पुत्रवान् या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकार कन्यावान असा करून, तशांनीही उपास करू नये असे म्हणतात.
(०७) ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांना सांगितले आहे.
(०८) ‘सर्व वर्णांना राहुदर्शनाचे सूतक आहे’ म्हणून ग्रहणकाळात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्याने धुऊन शुद्ध करावीत.
(०९) गाई, भूमि, सोने, धान्य वगैरेचे जर ग्रहणांत दान केले, तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो ब्राह्मण, तो दानपात्र होय. सत्पात्री दानाचे मोठे पुण्य आहे. ‘चंद्र-सूर्याच्या ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे, सर्व ब्राह्मण व्यासांसारखे आणि सर्व दाने भूमिदानासारखी असे वचन आहे.
(१०) ग्रहणांतले श्राद्ध करायचे ते आमान्नाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्ने करून करावे. सूर्यग्रहणांत तीर्थयात्रांग श्राद्धाप्रमाणे ज्यात तूप मुख्य आहे अशा अन्नाने श्राद्ध करावे. ग्रहणात श्राद्धाला जेवणारा महादोषी होतो.
(११) श्रीमंताने ग्रहणांत तुलादानादिक करावे.
(१२) चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणात तीर्थाचे ठिकाणी महापर्वकाळी मंत्राची जर दीक्षा घेणे असेल, तर महिना, नक्षत्र वगैरे शोधण्याची जरूरी नाही. मंत्रदीक्षा घेण्याचा प्रकार तंत्रग्रंथात पाहावा. दीक्षा शब्दात उपदेशाचा अन्तर्भाव होतो. युगायुगात दीक्षा होते आणि कलियुगात उपदेश होतो. मंत्र घेण्याच्या कामी सूर्यग्रहणच मुख्य आहे. चंद्रग्रहणात जर मंत्र घेतला, तर दारिद्र्यादिक दोष प्राप्त होतात असे कोणी सांगतात.
(१३) ‘आधी उपास करून, चंद्रसूर्याच्या ग्रहणांत स्नान करावे; आणि स्पर्शकालापासून मोक्षकालापर्यंत एकाग्रचित्ताने मंत्राचा जप करावा, मग जपाचा दशांश होम करावा, आणि नंतर होमाचा दशांश तर्पण करावे. होम करण्याचे सामर्थ्य नसल्यास, होमसंख्येच्या चौपट जप करावा.’ मूलमंत्राचा जप करून, त्याच्या शेवटी द्वितीया विभक्त्यंत असा मंत्रदेवतेच्या नावाचा उच्चार करून, ‘अमुकदेवता तर्पयामि नमः’ असे मोठ्याने म्हणावे. यवादियुक्त अशा पाण्याच्या ओंजळींनी होमाच्या दशांशाने तर्पण करावे. याप्रमाणे ‘नमः’ वर संपूर्ण मूलमंत्राचा उच्चार करून, अमुक देवतेला मी अभिषेक करतो असे म्हणून तर्पणाच्या पाण्याने आपल्या स्वतःच्या मस्तकावर अभिषेक करावा. याप्रमाणे तर्पणाच्या दशांशाने मार्जन करावे व तर्पणाच्या दशांशाने ब्राह्मणभोजन घालावे.
पुरश्चरण: उपरोक्त सांगितल्याप्रमाणे प्रमाणे जप, होम, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मणभोजन हे पाच प्रकारांच्या रूपाचे पुरश्चरण होय. तर्पण वगैरे करणे जर अशक्य असेल, तर त्या त्या संख्यांच्या चौपट जप करावा. हा जो पुरश्चरणाचा प्रकार सांगितला, तो ग्राससहित उदय अथवा अस्त पावणार्या ग्रहणांत होत नाही. पुरश्चरणसंबंधाने जो उपास करावयाचा, तो पुत्रवान आणि गृहस्थाश्रमी यांनीही करावा. पुरश्चरण करणार्याच्या नित्य नैमित्तिक स्नानदानादिकांचा जर लोप होईल, तर दोष सांगितला असल्याने, स्नानदानादिक कर्मे मुलगा, बायको वगैरे प्रतिनिधींकडून करवावी.