बातम्या

योग लेखांक – ३

प्राण आणि मनाचा संबंध प्राण ही एक शक्ती किंवा ऊर्जा आहे. सर्व विश्वात ती भरून राहिली आहे. त्या ऊर्जेचा काही अंश आपल्यात आहे. हे नीट समजून घेऊन आपल्या आंतरिक ऊर्जेला त्या अनंत उर्जेशी जोडणे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व प्रथम त्या ऊर्जेचे स्वरूप आपल्याला समजणे गरजेचे आहे. ही प्राण शक्ती दिसत नाही मात्र ती अनुभवता येते. एखाद्या दिवशी आपल्यामध्ये प्रचंड उत्साह संचारतो. त्यावेळी आपल्यात ती अधिक प्रमाणात असते. तर कधीकधी एकदम मरगळ जाणवते. त्यावेळी प्राणशक्ती खूप कमी झाली आहे असे समजावे. याचा अर्थ असा होतो की, प्राणशक्तीचे हे प्रमाण आपल्या शरीरात कमीजास्त होत असते. ते वाढवता येते किंवा कमीही करता येते. कमी जास्त करण्याची ही क्रिया ज्याद्वारे केली जाते त्यास प्राणायाम म्हणतात. प्राणायामाचे अलीकडे खूपच अवडंबर माजवले गेले आहे. कधी कधी प्राणायाम म्हणजेच योग कि काय असाही आभास निर्माण केला जातो. ती असनांप्रमाणे अष्टांग योगातील एक पायरी आहे. शरीरातील ही प्राणशक्ती कशी समजून घ्यावी बरे? त्यासाठी श्र्वासाचा आधार घ्यावा. श्वास घेणे, सोडणे किंवा कमीजास्त करणे आपल्याला शक्य आहे. प्राण आणि श्वास खूप जवळ आहेत. श्वास थांबवला की प्राण घुटवळतो. म्हणजेच श्र्वसनावर नियंत्रण आणल्यास प्राण समजून घेता येईल. मनास नियंत्रित करता येईल. जो आपल्या श्वसन प्रणालीवर नियंत्रण मिळवतो त्यास आपल्या मनाच्या क्रिया नियंत्रित करता येऊ शकतात. चित्ताच्या हालचालीस दोन गोष्टी कारणीभूत असतात. पहिले कारण म्हणजे वासना किंवा इच्छा. आणि दुसरे कारण म्हणजे प्राण किंवा जीवन ऊर्जा जी श्वासोच्छ्वासाशी निगडित असते. दोन्ही घटक परस्परांशी संबंधित आहेत. प्राण आणि मन परस्परावलंबी असतात. मन कृतिशील झाले की तिथे प्राण ऊर्जा पोहचते. ज्यावेळी ह्या दोहोंवरही संयम केला जातो त्यावेळी इंद्रिये स्वतंत्र होतात. व ती प्रचंड कार्यक्षमतेने कृतीशील होतात. सध्या आपली पाचही ज्ञानेंद्रिये मनाच्या ताब्यात आहेत मनाच्या नियंत्रणात काम करतात. ज्यावेळी मूड नसेल त्यावेळी ती लगेच सुस्तावतात. म्हणजेच मनास ताळ्यावर आणल्यास ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला हवी तशी कामे करून घेता येतात. अंतरंग योगात ही ज्ञानेंद्रिये पूर्णपणे आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. अष्टांग योगात प्रत्येक पायरीचे विशिष्ट असे उद्दिष्ट आहे. आसनांचा उद्देश पुढील योगसाधनेसाठी शरीरास सक्षम करणे असा आहे. तर प्राणायामाचा उद्देश मनाचा क्षोभ कमी कमी करीत नेणे असा आहे. प्राणायामाने ज्ञानप्राप्ती होत नाही; तर शरीरात एक संतुलित स्थिती निर्माण होते. प्राणायामाने मन स्थिर होते. प्राणायामाचे हे उद्दिष्ट लक्षात आले की प्राणायाम कसा करायचा, किती वेळ करायचा हे लक्षात येते. जर मन स्थिर झाले तर जगात असे काहीही नाही जे आपण प्राप्त करू शकणार नाही. स्वामी विवेकानंद हे याबाबतीत एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या संचित कर्मामुळे आपल्या जीवनास एक जी गती निर्माण झालेली असते, तिच्यामुळे विशिष्ट कर्मांना आपल्याला सामोरे जावे लागते. ती चुकवता येत नाहीत. परंतु प्राणायामच्या नित्य सरावाने मन संतुलित होऊन कर्म गती बदलता येते. व काही कर्मे आपल्या वाट्याला येत नाहीत. आली तरी त्यांची तीव्रता कमी होते. म्हणजेच कर्म गती प्राणायामाने तोडता येते. मनातील क्षोभ कमी करण्याचे काम प्राणायाम करतो. हे लक्षात ठेवावे. प्राणायामाचे अशाप्रकारे उद्दिष्ट लक्षात आले की अनेक प्रकारचे प्राणायाम करण्याचा मोह आपल्याला टाळता येतो. पूरक, कुंभक, आणि रेचक ह्या तीन प्रणायामाव्यतीरिक्त इतर प्राणायाम ध्यानाच्या अभ्यासासाठी फारसे उपयोगाचे ठरत नाहीत. त्यात साधकाने वेळ घालवू नये. त्याने पुढे प्रत्याहार ह्या पायरीच्या अभ्यासाला लागावे. असे पतंजलींचे स्पष्ट मत आहे

पेडणेकर सर, मंडणगड.
📞 9420167413

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!