बातम्या

भाजप जिल्हाध्यक्षांच्या पाठपुराव्याने विश्वकर्मा कृषी अवजारे समूहाला मिळाला न्याय..; कमलाकर मसुरकर यांनी उपोषण घेतले मागे.

रत्नागिरी, ता. ६ : उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात उद्योग आजारी पडत असताना भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना फैलावर घेतल्याने आज देवरुख येथील विश्वकर्मा कृषी अवजारे समूह उद्योगाचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी उपोषण सोडले. तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणाला सूचना देण्यात येणार आहेत. मागण्या मान्य झाल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर रविवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपोषण सोडताना श्री. मसुरकर भावुक झाले, भाजपाने लक्ष घातल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे, असे सांगितले. श्री. मसुरकर हे गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. मागील महिन्यात त्यांनी देवरुखला उपोषण केले होते. हा समूह उद्योग सुरूच न होता बंद पडला होता. त्यांचा पाठपुरावा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केला. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हणबर यांचा कार्यालयात जाऊन समाचार घेतला. राज्य सरकार पैसे देतंय, पण उद्योग चालू होत नाही, असे चालणार नाही. हा उद्योगमंत्र्यांचा जिल्हा आहे, तरीही उद्योग बंद पडत आहेत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी त्यासाठी काहीही करत नाहीत, याबद्दल जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी झाल्यानंतर मशीन ऑपरेटरद्वारा मुख्य घन मशिन ट्रायल करून देण्याबाबत कार्यवाही करावी. मुख्य घन मशिन, हॅमर फोर्जिंग मशीनची ट्रायल झाल्यानंतर श्री. मसुरकर यांनी स्वतः कायमस्वरूपी वीज जोडणी घेण्याबाबत अर्जदारांना निर्देश दिले आहेत. उर्वरित मागण्या शासन स्तरावर कळवण्यात याव्यात, असे पत्र अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष वारंवार पाठपुरावा करत असल्याने प्रशासन हलले आहे, असे देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी सांगितले. हा उद्योग चालू व्हावा आणि लोहार समाजाला मदत व्हावी, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी भाजपाचे मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे, तालुका सरचिटणीस उमेश देसाई, अमोल गायकर, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार मयेकर, दादा ढेकणे, मंदार खंडकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष रुपेश कदम आदी उपस्थित होते.

महाव्यवस्थापकांना पुन्हा घेतले फैलावर..
महाव्यवस्थापक उपोषण सोडण्यासाठी आले होते. परंतु ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी शोधून आणले. त्यानंतर पत्रातील सर्व अटींची पूर्तता कधी करणार, असा सवाल करत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी महाव्यवस्थापकांना फैलावर घेतले. उद्योगमंत्र्याच्या जिल्ह्यात ही दयनीय स्थिती असल्याबद्दल सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. उद्योग खात्याने काम न केल्यामुळेच मसुरकर यांना उद्योग विभागाविरोधात उपोषणाला बसावे लागले, याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. एमआयडीसीतील उद्योजकांनाही अशा प्रकारे त्रास देता का असा खडा सवाल केला. सरकारचा पगार घेता तो जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या सुविधांसाठीच असतो, असे सांगत महाव्यवस्थापकांना धारेवर धरले.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!