बातम्या

रत्नागिरी नगरपरिषद कर्जबाजारी! निवृत्त कर्मचाऱ्यांचे अडीच कोटी रूपये थकवले, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप.

रत्नागिरी : नगर परिषदेची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. गेल्या दोन वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, पगार रोखीकरण आणि इतर भत्ते असे अडीच कोटी रूपये देणे आहे. कामगार मक्तेदारांचे दर महिना 35 लाख रूपये असे सात महिन्याचे पैसे दिलेले नाहीत अशी दयनीय अवस्था नगरपरिषदेची असून त्याला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर म्हणाले की, रत्नागिरी नगर परिषदेची सुधारित नळपाणी योजना सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून घेतली आहे. त्या योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यासाठी नगरपरिषदेने आर्थिक भाग भरण्याची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. त्यामुळे यापूर्वीच नगरपरिषद आर्थिक संकटात असताना मुख्याधिकारी यांनी हाती घेतलेली विकासकामे नगरपरिषदेला आर्थिक अडचणीत आणत आहेत.

▶️ *एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेला निधीतील रूपयाही आला नाही*
              वर्षाभरापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनासाठी नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले होते. त्यावेळी नगर परिषदेला उर्वरित निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक रूपयाही आला नसल्याचा आरोप मिलिंद कीर यांनी केला आहे. 100 कोटी रूपये निधीच्या रस्त्यांच्या घोषणेमध्ये रत्नागिरी नगर परिषदेने भाग भांडवलासाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. आज नगरपरिषदेच्या ठेकेदारांची 35 कोटी रूपयांची देणी आहेत. आज नगर परिषदेचे क्रेडीट रेटिंग झालेले नाही त्यामुळे कोणीही नगर परिषदेला कर्ज देणार नाही अशी अवस्था असल्याचे मिलिंद कीर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी शहराध्यक्ष नीलेश भोसले उपस्थित होते.

▶️ *त्या कामांची चौकशी करा!*
रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील विविध विकास कामांची ई निविदा सूचना क्र. 09, सूचना क्र. 06, सूचना क्र. 08 दिनांक 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत विविध प्रकारच्या योजना अंतर्भूत आहेत. त्या कामांपैकी काही कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत. काही ठिकाणी चांगल्या स्थितीत गटार असताना सुध्दा ते तोडून नवीन गटार बांधले आहे. अशा कामाना नगरपरिषद जबाबदार आहे. ही सर्व कामे थांबवून त्याची चौकशी करावी अशी मागणी मिलिंद कीर यांनी केली आहे. आज घन कचरा प्रकल्प रखडण्याला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप कीर यांनी केला.
▶️ *मुख्यमंत्री अवैध बांधकामाचे उदघाटन करणार*
            तारांगणासाठी माळनाका येथील दहा टक्के जागेचा वापर करायचा होता. मात्र तारांगणासाठी संपूर्ण जागा वापरली आहे. त्यामुळे उर्वरित बांधकाम हे अवैध असून उद्या त्याच कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करणार आहेत असा टोला मिलिंद कीर यांनी हाणला.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!