रत्नागिरी : या आंदोलनावेळी हिंदूंनी हलाल मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. त्यासाठी पूजा साहित्य आणि श्री गणेशाचा प्रसाद हा हलाल प्रमाणित नसल्याची खात्री करूनच खरेदी करावा. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही हलाल अर्थव्यवस्थेच्या धोक्याविषयी विविध माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहनही या आंदोलनाद्वारे करण्यात आले. भारत सरकारच्या FSSAI आणि FDA यासारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकर करणाऱ्या शासकीय संस्था अस्तित्वात असताना, इस्लामवर आधारित हलाल व्यवस्था मुसलमानेतर लोकांचेवर लादून धर्माच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या हलाल प्रमाणपत्राला शासनाने अनुमती देऊ नये. खाजगी इस्लामी संघटनेला हलाल प्रमाणपत्र जारी करण्यास अनुमती दिल्याने भारत सरकारला मोठी आर्थिक हानी सोसावी लागणार आहे; म्हणून असे प्रमाणपत्र भारत सरकारच्या अधिकृत संस्थेद्वारे दिले गेले पाहिजे.

हलाल प्रमाणपत्र हे मांस आणि मांस उत्पादने यापर्यंत आता मर्यादित नाही, तर ते हळूहळू शाकाहारी अन्न, औषधे, रुग्णालय आदी अनेक क्षेत्रात बंधनकारक केले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेलाही हलाल अर्थव्यवस्था हे एक मोठे संकट बनले आहे. म्हणूनच ‘जमियत उलेमा -ए -हिंद’या संघटनेला अधिकृतपणे हलाल प्रमाणपत्राची मान्यता देण्याविषयीचे जारी केलेले नोटिफिकेशन केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.
यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेश सावंत यांनी हलाल सर्टिफिकेशन संदर्भात आजच भाजपातर्फे केंद्र शासनाकडे आपण पत्र पाठवत असल्याचे सांगितले. तसेच हिंदूंनी अशाचप्रकारे संघटीत होऊन आपल्या राष्ट्र व धर्मावरील आघातांविरोधात उभे राहिले पाहिजे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे सांगून सर्व हिंदूंनी दैनिक सनातन प्रभातचे वाचन केले पाहिजे.त्यामुळे राष्ट्र व धर्म विषयक डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखालील अमूल्य विचार सर्वांना ज्ञात होतील.
कोणत्याही धर्माच्या विरोधात असंवैधानिक बोलणे हा हेट स्पीच अंतर्गत गुन्हा होतो, तपास यंत्रणांनी अशा वक्तव्यांची स्वतः होऊन दखल घेऊन गुन्हे नोंदवा, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना अद्याप पर्यंत सनातन धर्म संपवण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, खर्गे, ए. राजा यांच्या विरोधात तपास यंत्रणांनी गुन्हा का नोंद केला नाही, असा प्रश्न श्री. चंद्रकांत राऊळ यांनी उपस्थित केला.
हलाल अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हलाल अर्थव्यवस्थेचा पैसा कुठे जातो, त्याचा विनीयोग कसा होतो, याची सखोल चौकशी तपास यंत्रणांनी करण्याचे आदेश केंद्र सरकारने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र सरपंच संसदेचे जिल्हा समन्वयक आणि कुवारबाव व्यापारी संघाचे सचीव श्री. प्रभाकर खानविलकर यांनी केली.
शेवटी हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी यांनी सनदशीर मार्गाने कृती च्या स्तरावरील प्रयत्नांची दिशा दिली.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री राकेश नलावडे, भाजपचे राजेंद्र पटवर्धन, विक्रम जैन, प्रशांत डिंगणकर, अशोक वाडेकर, लांजा येथील वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दादा रणदिवे, भैरू भंडारी, रत्नागिरी गोसेवा संघाचे गणेश गायकवाड आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने रत्नागिरी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. नायब तहसीलदार श्रीमती माधवी कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. विशेष म्हणजे आंदोलन स्थळी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. छायाचित्र द्यावे आणि हिंदुत्ववाद्यांनी गणेशोत्सवात हलाल उत्पादने घेणार नाही अशी एक प्रकारे प्रतिज्ञा केली. दखल न्यूज महाराष्ट्र.
