पाहिला यम -अहिंसा नवीन साधकाला योग शिकणे सोपे जावे म्हणून पतजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. अष्टांग योगामध्ये आठ पायऱ्या आहेत त्या अनुक्रमे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार,धारणा ध्यान आणि समाधी ह्या होत. यम ही अष्टांग योगातील पहिली पायरी होय. कोणत्याही गोष्टीला सुरवात करतांना प्रथम काय करू नये हे आधी सांगितले जाते. जसे लहान बाळाला जेव्हा पहिल्यांदाच शाळेत टाकले जाते तेव्हा काय करू नको ते आधी सांगितले जाते. पतंजलीही सुरवात “काय करू नये” यांने करतात. अशा एकूण पाच गोष्टी आहेत. त्या अनुक्रमे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्र्हम्ह्चर्य आणि अपरिग्रह ह्या होत. अहिंसा तीन प्रकारची असते. कायिक वाचिक व मानसिक. पैकी कायिक व शाब्दिक अहिंसा आपल्याला माहित असते. मानसिक हिंसा सूक्ष्म असते. इतरांविषयी नकारात्मक विचार करणे हे सुद्धा हिंसेमध्ये मोडते. हे किती जणांना ठाऊक आहे? इतरांना मारणे किंवा दुखावणे याला आपण हिंसा मानतो. परंतु ध्यानाच्या दृष्टीने जेव्हा आपण अहिंसा पाळावी असे म्हणतो त्यावेळी आपल्या विचारांना आधी सांभाळाचे असते. कारण चांगले विचारच आपला उद्धार करणार असतात. त्यासाठी सर्व बाजूंनी विचारांचा प्रवाह सकारात्मक व्हायला हवा. इतरांविषयी वाईट विचार म्हणजे स्वत: बद्दलच वाईट विचार. कारण सर्वांभूती मीच वसलो आहे. हा विचार जितका एकाग्र होत जाईल तितके आपले नाते ईश्र्वराशी लवकर जुळणार आहे. दुसऱ्याचे नुकसान म्हणजे आपले नुकसान ही भावना जसजशी मनात दृढ होत जाते तसतसे अहिंसा व्रत पक्के होत जाते. हिंसा म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष हस्तक्षेप करणे होय. आणि इतरांच्या जीवनात अशाप्रकारे ढवळाढवळ करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? आपल्याप्रमाणेच इतर माणसे, प्राणी, जीवजंतू, जगत असतात. प्रत्येक जण आपापल्या कर्मगतीनुसार वाटचाल करीत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनमार्गात अडथळे आणणे योग्य ठरत नाही. आपण जे काही कर्मे करीत असतो, मग ती शाब्दिक किंवा मानसिक का असेना त्याचे ओरखडे स्मृती पटलावर उमटत जातात. अशा नकारात्मक गोष्टी स्मृतीपटलावर जमा झाल्यास मनामध्ये अस्वस्थता निर्माण होणे साहजिकच आहे. दैनंदिन जीवनात अजाणतेपणी अशी अनेक कर्मे आपण करीत असतो. इतरांशी वागत असतो. मनामध्ये काही हेतू धरून बोलत असतो, इतरांना सुधारण्याच्या भानगडीत पडत असतो. हे सर्व करीत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येत नाही, ती म्हणजे प्रत्येक जीवाची वैचारिक पातळी भिन्न असते. मनुष्याचाच जरी विचार केला तरी प्रत्येक मनुष्य त्याच्या त्याच्या वैचारिक पातळीवर जगत असतो. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही बाह्य विचारांची सक्ती करता येत नाही. त्यामुळे एखाद्याला समजावणे किंवा विचारांची सक्ती करणे ही जबरदस्ती (हिंसा) होते. हा विचार सुरवातीला अवघड वाटतो. परंतु हळूहळू त्याचा सराव करावा लागेल. प्रतीपक्ष भावना त्यासाठी खूप उपयोगी ठरते. ज्यांना असा विचार करणे कठीण जाते त्यांनी प्रतिपक्ष भावनेचा सराव करावा. प्रत्येकाने आपला पिंड(धर्म) ओळखावा. तसेच इतरांच्याही पिंडाचा सन्मान करावा. म्हणजे ही वैचारिक हिंसा होणार नाही. संतापलेल्या माणसावर पुन्हा आपण संतापने ही आपल्याकडून होणारी हिंसाच होय. अशा माणसाला सहानुभूतीची गरज असते. तिथे करुणा ह्या भावनेचा उपयोग करावा. योग शिकणे म्हणजे रोज एक तासभर आसन, प्राणायाम करणे नव्हे, तर योगातील जी तत्वे आहेत ती अगदी सावधपणे व्यवहारात वापरायला शिकणे म्हणजे योग शिकणे असा अर्थ आहे.
पेडणेकर सर, मंडणगड
📞 9420167413