आजमितीस अनेक भारतीय विद्वानांनी आपापले गणितावर आधारित संशोधन केलेले आहे. मात्र याच विद्वानांच्या परंपरेतील एक असलेले भास्कराचार्य यांनी दिलेली गणितीय सूत्रे आजच्या काळात देखील लागू पडतात असे प्रतिपादन अन्वेष देवुलपल्लि यांनी केले. ते त्रि दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेत बोलत होते.
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने,कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित त्रि दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी झाले. याच कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात The Bhaskaracharya Classroom या विषयावर कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे शोधछात्र अन्वेष देवुलपल्लि यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले की, आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण जी आकडेमोड करतो, जे आर्थिक गणिताचे ठोकताळे मांडतो त्यालाच शालेय व्यवस्थेत सूत्रात्मक गणितातून शिकवलं जात. अशारीतीने हे गणित आपल्या जीवनाचा एक भाग झालेले आहे. दरम्यान गणितासारखा पूर्ण संख्यात्मक भाग अथवा विषय शिकवण्यासाठी सोपी पद्धत वापरणे आवश्यक असते आणि हीच बाब भास्कराचार्य यांनी आपल्या अध्यापन पद्धतीत आणली. आपल्या शिष्यांना वेगवेगळी पौराणिक, ऐतिहासिक उदाहरणे देऊन त्याद्वारे विविध गणिताचे प्रमेय, सूत्रे शिकवली. त्यामुळे गणिताचे पक्के ज्ञान शिष्यांना झाले. भास्कराचार्यांच्या रंजक अध्यापन पद्धती विषयी ही त्यांनी प्रतिपादन केले. भास्कराचार्य यांची गणितशास्त्र शिकविण्याची पद्धत अनोखी होती तीच पद्धत आजच्या काळातही उपयुक्त असून तिचा अवलंब मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण होईल.
आपण देखील या गणिताचा आनंद घेऊन ते आत्मसात केले पाहिजे असे अन्वेष देवुलपल्लि यांनी म्हटले.
यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ कल्पना आठल्ये यांच्या हस्ते अन्वेष देवुलपल्लि यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे संस्कृत विभाग प्रमुख डॉ कल्पना आठल्ये, प्रा स्नेहा शिवलकर, प्रा प्रज्ञा भट, उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी, स्थानिक रत्नागिरीकर व गणित विषयाचे शिक्षक उपस्थित होते.