राजापूर. :- (प्रमोद तरळ) रिफायनरी प्रकल्पाच्या स्वप्नरंजनातून आता राजापूर शहरासह तालुक्याने बाहेर येणे गरजेचे आहे. सर्वच राजकारणी या प्रकल्पाचा गेले नऊ वर्षे राजकारणासाठी वापर करीत असल्याने व याबाबत ज्यांच्याकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे अशा केंद्र व राज्यातील नव्या केंद्रपुरस्कृत सत्ताधाऱ्यांकडूनही दुसऱ्यांदा राजापूरकर जनतेला केवळ गाजर दाखवण्याचे काम केले जात आहे. गेल्या नऊ वर्षांचा अनुभव पाहता आपण ५७ संघटनांच्या रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत. यापूढे केवळ जबाबदारी स्वीकारलेल्या राजापूर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदासाठी व त्याच्या अहोरात्र कार्यासाठी आपण बांधील असल्याचे श्री. महेश शिवलकर यांनी जाहिर केले आहे.
रिफायनरी प्रकल्पातून महाप्रचंड रोजगार निर्मिती होईल यासाठी राजापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींचा व ५५ विविध संघटनांनी या लढ्यात सामिल व्हावे यासाठी आपला काहीअंशी पुढाकार होता. मात्र रिफायनरी मुद्द्यावरून रोजगार निर्मिती होण्याऐवजी अनेक लोकल पुढाऱ्यांची निर्मिती झाली. पुढील काळात या मुद्द्यावर आणखीही पुढारी उदयाला येऊ शकतात. मात्र प्रकल्पाबाबत गेल्या नऊ वर्षात कोणतेही ठोस आणि कृतीशील आश्वासन किंवा कृती झालेली नाही. ज्या गावांत हा प्रकल्प होणार आहे अशा गावांतील अधिकांश ग्रामस्थांनी वारंवार प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे. त्या ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत सोयरसुतक नाही. त्यामुळे व इतरही राजकारणामुळे हा प्रकल्प होईल अथवा कसे याबाबत कोणीही ठोस भूमिका मांडण्यात धजावत नाही. यापुढे माझ्या ओबीसी समाजाच्या इतर प्रश्नांसाठी आपण रक्त आटवल्यास त्याचा सामुहिक लाभ होईल या भावनेने आपण आजपासून रिफायनरी
प्रकल्पाच्या समर्थन लढ्यातून बाहेर पडत असल्याचे व ओबीसी समाजाच्या उत्कर्ष लढ्यात जोमाने सक्रिय होत असल्याचे श्री. शिवलकर यांनी स्पष्ट केले आहे.