रत्नागिरी : रखडलेल्या आणि सतत मागणी होत असलेल्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला मुहूर्त मिळाला असून नुकतीच कामाला सुरुवात झाली आहे.
डिसेंबर २०११ रोजी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमीपूजन झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम झाले नाही. ठेकेदाराने केवळ दगड आणून किनाऱ्यावर टाकले होते. १० महिन्यांमध्ये मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्याकरिता पत्तन विभाग सातत्याने पाठपुरावा करत होता. त्यानंतर पत्तन विभागाने ठेकेदार कंपनीत डी.व्ही.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.कंपनीला १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडात्मक कारवाई करूनही ठेकेदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे पुन्हा १८ लाखांचा दंड ठेकेदार कंपनीला ठोठावण्यात आला. एकूण ३६ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर ठेकेदाराला जाग आली. नोव्हेंबर महिन्यापासून ठेकेदाराने मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
या कामाचा सातत्याने पाठपुरावा या गावचे मच्छीमार नेते अप्पा वांदरकर आणि महाराष्ट्र समविचारी मंच ने केला होता.आतातरी हे काम पूर्णत्वास जावो अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.